To Reach The People & Community!
 दिनविशेष

 महाराष्ट्र

महिला शेतकरी गटाच्या इर्जिकमुळं एकीचं तुफान, २४ एकरांतील सोयाबीन काढणीचा डोंगर केला सर, इतिहास घडवत लाखोंची बचत!

THE XYE NEWS   03-12-2023 22:45:31   1112793

महिला शेतकरी गटाच्या इर्जिकमुळं एकीचं तुफान, २४ एकरांतील सोयाबीन काढणीचा डोंगर केला सर, इतिहास घडवत लाखोंची बचत!

भोसरे (ता. खटाव ) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार इर्जिकच्या माध्यमातून तब्बल २४ एकरातील सोयाबीनची काढणी करून लाखो रुपयांची बचत केली आहे. कृषी यांत्रिक युगात हद्दपार होत चाललेला गावगाड्यातून एका 'ग्राम सहकार' चळवळीला महिलांनी पुनर्जीवित केले आहे. त्यामुळे महिला शेतकरी गटाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. खटाव तालुक्यातील भोसरे गावच्या सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी गेली आठ दिवस दररोज तीन ते चार तास एकमेकांच्या शेतात इर्जिक करून तब्बल १ लाख २५ हजार ६२५ रुपयांची बचत केली. रोजंदारी आणि यांत्रिकीकरणासाठी वापरण्यात येणारा हा खर्च महिलांनी बचत केला आहे. या इर्जिकच्या अनोख्या पायंड्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

जुनं तेच सोनं असं म्हणत सुरु झालेल्या इर्जिकची सांगता महिला शेतकरी गटातील भोसरे गावच्या गुजर आज्जींच्या शेतात झाली. गुजर आजींच्या शेतात तब्बल ६ एकर सोयाबीन काढणीसाठी इर्जिकच्या माध्यमातून सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात आली. अवघ्या अडीच- तीन तासात सहा एकरमधील सोयाबीन काढणी पूर्ण झाली. यासाठी खटाव, माण आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकरी गटांना इर्जिकचे आमंत्रण दिले होते. महिलांच्या एकीचं तुफान आलं बघता बघता सोयाबीन काढणी पूर्ण झाली.

आठ महिला शेतकरी गटांतील १२४ शेतकरी सदस्य इर्जिकमध्ये सहभागी झाले होते. या इर्जिक सोहळ्याची सांगता पारंपरिक बाज राखत करण्यात आली. महिला शेतकरी गटातील सदस्यांची हळदी कुंकू व ओटी भरण्यात आली. सोयाबीन काढताना महिला शेतकऱ्यांनी "भल्लरी... दादा...भल्लरी...," "अगं मैना तुझी हौस पुरवीन..." या गाण्यापासून सुरुवात करून लोकगीत व देवीची गाणी म्हणत कामाचा ठेका धरला. या ठेक्यातच महिला शेतकऱ्यांनी तल्लीन होऊन काही तासातच सोयाबीन काढले.

इर्जिकमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या दुपारच्या श्रमपरिहारासाठी जेवणाचा बेत गुजर आजींच्या घरी आयोजीत केला होता. आठ दिवस सुरू असलेल्या या इर्जिकसाठी माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील जिजाऊ महिला शेतकरी गट, कृषिलक्ष्मी महिला शेतकरी गट (आसनगाव), सावित्री महिला शेतकरी गट, प्रगती महिला शेतकरी गट (विसापूर ), जयराम महिला शेतकरी गट (जायगाव), सुयोग पानी फाउंडेशन महिला शेतकरी गट (पांगरखेल), छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट (भोसरे), सुयोग पानी फाउंडेशन महिला शेतकरी गट (पांगरखेल), यशवंत शेतकरी गट ( पिंपरी) हे महिला शेतकरी गट सहभागी झाले होते.

बचत गटाच्या माध्यमातून फक्त पैशाची देवाणघेवाण करण्यापेक्षा एकत्रित सामूहिक शेती केल्याने सामाजिक, आर्थिक पत वाढत आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्यांचे गट पारंपरिक बचत गटाच्या तुलनेत महिलांचे आर्थिकमान उंचावण्यासाठी फायदेशीर ठरू लागले आहेत. ही पारंपारिक ग्राम चळवळ उभी राहिल्याने आज मजुराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. शेतकऱ्यांच्या इर्जिकीच्या माध्यमातून कष्ट करण्याची तयारी या इर्जिकीतून अनुभवयास मिळत आहे. ही मजा काही वेगळीच असते. महिलांचे ऐक्य, कष्ट व हिम्मत अशा सामूहिक कामातून प्रत्ययास येते."

गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे शेतकऱ्याच्या शेतातील सुगीची कामे करणे म्हणजेच इर्जिक होय. ही गावगाड्यात प्रचलित असलेली पारंपरिक पद्धत आहे. गावाकडे कष्टाच्या कामाला मजूर मिळत नसल्याने शेतकरी इर्जिक घालत. म्हणजे त्याने मटण अथवा गोडधोड जेवणाचा बेत ठेवायचा. पूर्वी अशा इर्जिक खूप असत. आता त्या उरल्या नाहीत, नव्हे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. कोकणपट्टा सोडला, तर हे फारसं आपल्याकडे सद्यस्थितीत तरी दिसणार नाही.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती