To Reach The People & Community!
 दिनविशेष

 मुंबई शहर

कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे - पालकमंत्री दीपक केसरकर

THE XYE   20-10-2023 15:34:54   94

कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

- पालकमंत्री दीपक केसरकर

 

 

मुंबई दि. २० ( प्रतिनिधी ) : मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून त्यात या विषयावर चर्चा झाल्याचेही  केसरकर यांनी सांगितले.

    मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून कोळीवाडे आणि गावठाण्यात वास्तव्यास असलेले नागरिक मूळ रहिवासी आहेत.कोळीवाड्यांची, तेथील घरांची विशिष्ट रचना असते, त्यांची खास संस्कृती आहे. कोळीवाड्यांचे एक खास सौंदर्य आहे. हे सौंदर्य, ओळख टिकवून ठेवून हा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

    पुनर्विकासात किती एफएसआय द्यावा, कसा विकास असावा इतर बाबींसाठी नवीन डीसीआर तयार केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. तसेच कोळीवाड्यात राहणाऱ्यांना सोयी-सुविधाही देता येतील, या दृष्टीने ही नियमावली परिपूर्ण असेल, असेही ते म्हणाले.

    येत्या सोमवारपासून मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना संबंधित अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन आढावा घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोळीवाडे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तिथेच खानपानाची व निवासाचीही सुविधा मिळू शकेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबरोबर येथे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. येथे येणार्‍या देशी-परदेशी पर्यटकांना वैशिष्ट्यपूर्ण कोळी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. तसेच संस्कृती-परंपरेचे दर्शन घडणार आहे. येथे राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. महानगरपालिकेकडून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाड्यात उपक्रम राबवला जाणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती